मुणगे आपईवाडीतील मच्छिमार हवालदिल
मसुरे
समुंद्रामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याच्या लाटांचा फटका
देवगड तालुक्यातील मुणगे येथील नवी रापण आपईसंघ यांच्या रापणीला बसला आहे. रापणी साठीची जाळी खडकाना लागून तुटून वाहून गेल्यामुळे समारे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. आताच हंगाम चालू होऊन काही दिवस झाले असताना दोन लाखांचा फटका या मच्छिमारांना बसल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
शुक्रवारी सकाळी रापणी व्दारे मच्छीमारी करण्यासाठी येथील नवी रापण संघ मुणगेचे अध्यक्ष दाजी मोर्वेकर, सचिव कृष्णा ऊर्फ दादा सावंत, अशोक मुणगेकर, संतोष ठुकरूल, नारायण सावंत, कुणाल सावंत, दिपक पाटकर, संजय परब,दाजी सावंत, बाबू राणे, हरिष परब, बाळकृष्ण परब आदी होडीतून रापणीची जाळी पाण्यात सोडत गेले होते. जाळी पाण्यात सोडून होडी समुद्र किनारी आल्या नंतर रापणीची जाळी ओठण्यास सुरुवात केली. यावेळी समुद्राच्या अचानक पणे वाढलेल्या पाणी व लाठांमुळे रापणीची जाळी समुद्रातील खडकाना अडकून व पाण्याच्या लाठांमुळे सुमारे २४/ २५ पाटे (जाळ्याचे जोडलेले भाग ) वाहून गेले त्यामुळे जाळ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.पाऊस कमी झाल्यानंतर या रापण संघाने रापण लावण्यास सुरुवात केली होती. परंतु ऐन मासेमारीच्या मोसमामध्ये रापण संघाचे असे मोठे नुकसान झाल्यामुळे मोसमामध्ये मासेमारी करणे शक्य होणार नसल्याने ते सुध्दां नुकसान होणार आहे. मागिल वर्षीसुध्दा अशाच पध्दतीने मासेमारीच्या मोसमामध्ये पाऊस पडत रहिल्यामुळे रापणसंघाना रापणी लावण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे फारमोठे आर्थिक नुकसान झाले होते असे नवी रापण आपईसंघाचे सचिव कृष्णा ऊर्फ दादा सावंत यानी बोलताना सांगितले. या रापण संघामधील सर्व सदस्य हे मोलमजुरी करणारे असल्याने झालेले नुकसान आणि आता ऐन मासेमारीच्या मोसमामध्ये होणारे आर्थिक नुकसान यामुळे खचून गेले आहेत. तातडीने नुकसान भरपाईची मागणी दादा सावंत यांनी केली आहे.