वेंगुर्ला /-
सध्या मुंबई – कल्याण येथे राहणारे मूळ वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा जाधववाडी येथील रमेश गोपाळ नाईक (वय ५०) यांचा मृतदेह आज गुरुवार 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गळफास लावून लटकत स्वतःच्या शेतमांगरात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कल्याण येथे राहणारे नाईक यांची लॉकडाऊन मध्ये नोकरी गेल्याने ते मनाने खचले होते. अधून-मधून गावाला येत असत. दरम्यान आज सकाळी काही कामासाठी त्यांचे भाऊ अरविंद नाईक शेतमांगरात गेले असता त्याला रमेश याचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी तत्काळ या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दाभोलकर करीत आहेत.