सावंतवाडी /-
येथील माजगाव मेटवाडा परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिल्यानंतर माजगाव परिसरातील ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर पुकारलेले उपोषण मागे घेतले.
गेल्या तीन महिन्यापासून पालिकेने नळपाणी योजनेचा पुरवठा बंद केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर गांधी जयंती दिवशी संबंधित ग्रामस्थांनी उपोषण्ा छेडले. नळपाणी योजनेच्या प्रश्नावर येत्या बैठकीत तोडगा न निघाल्यास संबंधित प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.
यावेळी शार्दूल सावंत, रमाकांत राऊळ, नरेंद्र गद्रे, बापू तुळसकर, प्रतिक सावंत, बापू मालवणकर, बाळासाहेब नंदीहळळी, पवन सावंत, गोविंद माळकर, प्रसाद सावंत, सौरभ पडते, अभिजित सावंत, लक्ष्मण परब आदी उपस्थित होते.
माजगाव मेटवाडा परिसरात गेली अनेक वर्षे सुरु असलेला पाणीपुरवठा सावंतवाडी पालिकेकडून 1 जुलैपासून अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे परिरातील ग्रामस्थांना पाण्याविना हाल सोसावे लागत आहेत. याप्रश्नी सबंधित प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी यावेळी केला. या उपोषणाला तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी भेट दिली. येत्या मंगळवारी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक कार्यालयात आयोजित करुन याप्रश्नी तोडगा काढू तोपर्यंत उपोषण स्थगित करावे, असे सांगितल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. होणाऱ्या बैठकीत याप्रश्नी तोडगा न निघाल्यास संबंधित प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.