कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्ह्याला एका वर्षभरामध्ये राज्य सरकार व जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून एकूण ३२ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत, आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे महाविकास आघाडी सरकारचे आहे, त्यामुळे रुग्णवाहिकेसोबत फोटोसेशन करून अन्य कोणीही त्यासाठी फुशारक्या मारू नये, असा सल्ला शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी दिला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून मान पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपकभाई केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 29 प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत.. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. आत्ता नव्याने दाखल झालेल्या ४ रुग्णवाहिका देखील जिल्ह्यात आलेल्या असून त्याही अध्यक्षा संजना सावंत यांचे फोटोसेशन पूर्ण झाल्यावर रुग्ण सेवेत दाखल होत आहेत, तत्पूर्वी गट नेते रणजित देसाई यांनी सेल्फी विथ रुग्णवाहिका कार्यक्रम आटपा आणि रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी रुजू करा असा सल्ला दिला होता, राज्य शासनाने दिलेल्या रुग्णवाहिकासोबत सेल्फी विथ ड्रायव्हर असे फोटोसेशन करून गट नेत्यांनी दिलेला सल्ला अध्यक्षा श्रीमती संजना सावंत सहित माजी आरोग्य सभापती यांनी चांगलाच मनावर घेतला आणि प्रत्येक रुग्णवाहिकासोबत फोटो काढण्याचे ठरविले, त्यासाठी ४८ तास रुग्णवाहिका फोटो सेशनसाठी ठेवल्या, विशेष म्हणजे रणजित देसाई स्वतः ही या फोटो सेशनमध्ये सहभागी झाले. शासनाच्यावतीने आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. तरीही गट नेते रणजित देसाई विरोधाला विरोध करण्याचे काम करीत आहेत, चांगल्याला चांगलं म्हणण्याचे काम रणजित देसाई यांनी केले असते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने त्यांचे कौतुक केले असते, मात्र दुसऱ्यांना सल्ले द्यायचे आणि स्वतः विरोधाभास निर्माण करायचा हे संयुक्तिक नाही. आरोग्यामध्ये राजकारण करू नये एव्हढे समजून देखील नेत्यांना खुष करण्याची देसाई यांची धडपड सुरू आहे.