दोडामार्ग /-
दोडामार्ग तालुका होवून बरीच वर्षं झाली,मात्र नावापुरता तालुका आहे. विकासाच्या दृष्टीने तालुक्यात फक्त मोठमोठ्या गोष्टी होतात परंतु विकास मात्र थांबलेलाच आहे.दोडामार्ग तालुक्यात मुबलक पाणी तसेच शासनाच्या जागा देखील आहेत परंतु त्याचा योग्य प्रकारे उपयोग झाला नाही. दोडामार्ग तालुक्यातील लाखो तरुण-तरुणी बेरोजगार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार शासन उभा करून देत नाही. दोडामार्ग मधील तरूण तरूणीना शिक्षण घेवून फक्त ६ ते ७ हजार पगारा साठी गोवा येथे कामाला जावे लागते हे मात्र सत्तेत असणाऱ्यांचे दुर्दैव आहे. या तरुणांना पुढे येण्या साठी सरकारकडून कोणतेही प्रोत्साहन दिले जात नाही. आमदार दिपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना आणली परंतु त्या योजनेमधुन आमदार केसरकर किती तरुण- तरुणींना रोजगार देवू शकले हे त्यांनाच माहीती आहे.त्यांची ही योजना देखील असफल ठरली. मात्र त्या योजनेला खर्च करून कोट्यावधीचे नुकसान केल्याचे दिसते. आता ॲम्युझमेंट पार्क प्रकल्पाचे आपण स्वागतच करतो पण खऱ्या अर्थाने या प्रकल्पा मुळे तरुण तरुणींना रोजगार मिळण्याची हमी आमदार केसरकर देवू शकतील का? की चांदा ते बांदा योजने सारखा पैसा वाया घालवणार याचा त्यांनी खुलासा करावा. असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुनिल गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.