सावंतवाडी /-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी महाविकास आघाडी एकत्रित लढेल तर इतरांकडून योग्य प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडीची नेतेमंडळी निश्चित प्राधान्य देतील. सहकार समृद्ध होऊन टिकला पाहिजे यासाठी कायमच प्रयत्न आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी म्हटले आहे.
आमदार दिपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सतीश सावंत पत्रकार परिषद बोलत होते यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, सुशांत नाईक उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार टिकला पाहिजे, सहकार समृद्ध झाला पाहिजे सहकारामध्ये गुणात्मक वाढ होताना राजकारण नको हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे यासाठी मुंबई एक नुकतीच बैठक झाली.
या बैठकीत महा विकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे काँग्रेस संपर्कमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर , आमदार वैभव नाईक आदी उपस्थिती होते. यावेळी आघाडी करण्याचे धोरण निश्चित झाले आहे असे सतीश सावंत म्हणाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून येतील अशा उमेदवारांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरले असून त्यासाठी आघाडीचे पक्षनेते निश्चित सकारात्मक निर्णय घेऊन उमेदवार देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या व्यतिरिक्त इतरांकडून योग्य व्यक्तीने योग्य प्रस्ताव दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निश्चित महा विकास आघाडीची नेतेमंडळी विचार करतील असा विश्वास सतीश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.