सिंधुदुर्ग /-
कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपरिक असलेल्या बैलगाड्या शर्यती व बैलांची झुंज या कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांनाही सुरू करण्याची परवानगी मिळावी. या कार्यक्रमांत बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शर्यतीस अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आम. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.