मालवण /-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आपण महाविकास आघाडी मधूनच लढविणार असून सहकार टिकवणे, जिल्हा बँकेचा उत्कर्ष साधणे, शेतकरी व मच्छीमार यांची उन्नती करणे हाच आपला निवडणुकीचा फॉर्म्युला असणार आहे. गेले साडे सहा वर्षे संचालक मंडळाने जे काम केले आहे त्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. राजकारण डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलेले नसून कर्जाच्या परिपूर्ण प्रस्तावाला बँकेने कर्ज दिले नाही असे एक प्रकरण समोर आणून दाखवावे, असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी देतानाच तसे प्रकरण दाखविल्यास मी निवडणूक लढविणार नाही असेही पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बँकेच्या तारकर्ली येथील शाखेच्या स्थलांतरित नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संचालक व्हिक्टर डान्ट्स, मुख्य कार्यकारी अधिकरी अनिरुद्ध देसाई आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत म्हणाले, जिल्हा बँक ताब्यात घेऊ असे विरोध म्हणत तर असे विरोधक पाहीजेतच. बँकेत वेगवेगळे लोक असले तरी कारभार सुरळीत चालू आहे. बँकेच्या कारभारात आपण कधीही राजकारण आणले नाही. बँकेत पक्ष विरहित काम केले आहे. गेल्या साडे सहा वर्षात संचालक मंडळाच्या कारभारावर कधीही आरोप झाले नाहीत. कोणीही चुकीचे काम दाखवून द्यावे, असेही सतीश सावंत म्हणाले. विकास सोसायट्या जगविणे महत्वाचे असून त्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या यशस्वी कामकाजाची पाहणी इतर जिल्ह्यातील बँका करत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेती कर्जामध्ये इतर बँकांचा वाटा हा ४० टक्के असून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात एकट्या जिल्हा बँकेचा वाटा हा ६० टक्के एवढा आहे, असेही सतीश सावंत म्हणाले.