आचरा /-
गणपती विसर्जन वेळी पाण्यात गणपती विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी समुद्र, खाडी किनारी असलेल्या जीवरक्षक, सागरसुरक्षा रक्षकांच्या सहकार्यानेच विसर्जन करा असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांनी आचरा पोलीस स्टेशन येथे केले.
गणपती विसर्जन नियोजनाबाबत आचरा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी या बैठकीला आचरा सरपंच प्रणया टेमकर, रामेश्वर देवस्थान समितीचे अशोक पाडावे, प्रशांत खोत,आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, रविंद्र गुरव,सागररक्षक किशोर केळूस्कर, गोविंद आचरेकर पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, मिनाक्षी देसाई यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील यांनी गणेशोत्सव आनंदाचा उत्सव आहे. हा आनंद असाच द्विगुणित करण्यासाठी सर्वांनी आचरा पारवाडी,पिरावाडी किनारी आवश्यक त्या सुरक्षा साहित्यासह जीवरक्षक, आणि सागररक्षक तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्या सहकार्यानेच पाण्यात गणपती विसर्जन करा आणि विसर्जन सोहळा सुरक्षित करा.यावेळी
निर्माल्य निर्माल्य कुंडात टाकण्या बाबत तसेच गणपती विसर्जन सुर्यास्ता पूर्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे ही त्यांनी आवाहन केले.यावेळी इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पाडावे यांनी देवस्थान गणपती विसर्जनावेळच्या नियोजना बाबत मंडळाकडून घेण्यात आलेल्या सुरक्षेबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना दिली.