नवी दिल्ली /–
देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६१८ कोरोनाबाधित आढळले असून ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी २९ लाख ४५ हजार ९०७ झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या ४ लाख ४० हजार २२५ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३६ हजार ३८५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ३ कोटी ३१ लाख १ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
देशात सध्या ४ लाख ४ हजार ६८१ सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७.४३ आहे. तर, देशातील विकली पॉझिटीव्हीटी रेट ३.६३ वर असून हा दर गेल्या ७१ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.५० टक्क्यांवर असून ही चांगली बाब आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ५८ लाख ८५ हजार ६८७ जणांना कोरोनाची लस देण्यात आली. लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६७.७२ कोटी लोकांचं लसीकरण झालंय.
👉महाराष्ट्रातील परिस्थिती..
राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ हजार ३६० जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ९२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,७७,९८७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७६४३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम..
गेल्या २४ तासांत एकट्या केरळमध्ये २९ हजार ३२२ कोरोनाबाधित आढळले असून १३१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.