वेंगुर्ला /-


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी असंघटीत क्षेत्रातील ३८ कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई – श्रम पोर्टल सुरु केले आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ३८ कोटी असंघटीत कामगारांच्या नोंदणीची व्यवस्था बनवली जात आहे.या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक योजनांचा लाभ असंघटीत क्षेत्रातील कामगार / मजुरांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. ई – श्रम पोर्टल वर नोंदणी करणाऱ्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दोन लाखाचा अपघात विमा देखील मिळणार आहे.मोदी सरकारने असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई – श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे. येथे मजुर आपले कार्ड बनवु शकतात. या कार्डधारकांना सरकार कडून मदत दिली जाईल आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळेल. येथे देशातील प्रत्येक कामगाराची नोंद असेल. त्यामुळे कोट्यवधी कामगारांना नवीन ओळख मिळेल.तसेच असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.त्याचप्रमाणे सरकार असंघटीत कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल.तसेच हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकार कडून एक वर्षासाठीचा विमा मोफत दिला जाईल.या योजनेमध्ये लहान व सीमांत शेतकरी, शेतमजुर, मच्छिमार, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, घरकाम करणारे, वृत्तपत्र विक्रेते, मीठ कामगार, साॅ – मील मधील कामगार, आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक शेतकरी, लेदर कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, रिक्षा चालक, टेम्पो चालक, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, प्लंबर, इलेक्ट्रीशन व इतर सर्व कामगार ई – श्रम कार्ड काढु शकतात. हे ई – श्रम कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड, बॅंकेचे विवरण, मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक असुन , हे कार्ड महा – ई सेवा केंद्र , आपले सरकार किंवा सीएससी (CSC) केंद्रावर मोफत काढुन मिळेल.नोंदणी साठी असंघटीत कामगारांना कोणतीही रक्कम लागणार नसुन हे कार्ड मोफत केंद्र सरकार देणार आहे.
यासाठी १) वय १६ ते ५९ वर्ष असावे,२) आयकर भरणारा नसावा,३) EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत,४) असंघटीत कामगार श्रेणीमध्ये कार्यरत असणे आवश्यक.अशा अटी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page