मुंबई /-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अली आहे. बारामती शहरात जवळपास 3 हजार 408 वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलंय. निर्धारित नियमांचं पालन न करता अजित पवार यांच्यावर सदर जमीन ही 99 वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप अजितदादांवर करण्यात आलाय. ही जमीन गतीमंद मुलांच्या शाळेसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या जमिनीवर थिएटर बनवण्याचा घाट घातला जात असल्याचं कळतंय. या प्रकरणात लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

याचा खुलासाही भुजबळ यांनी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून एक बडे नेते छगन भुजबळ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक दिवसापूर्वीच गंभीर आरोप केलाय. छगन भुजबळ यांनी मुंबईत नऊ मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहत आहे. मात्र, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी

किरीट सोमय्या काल नाशिकमध्ये आले होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी केला. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

गेल्या चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले

‘गेल्या चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. त्या प्रॉपर्टी अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन आहे ती नाशिकपासून 20 किमी लांब एक लहानसा रस्ता होता. त्यावेळेला 1980 मध्ये घेतलेली जमीन आहे. त्यांनी आज शिळ्या कडीलाच उत आणायचा प्रयत्न केला आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. त्या केसेसवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे की काय? मला माहिती नाही. आमच्या न्याय देवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टात लढत आहोत. त्यामुळे मी याबाबत जास्ती बोलणार नाही. एवढंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही’, असा दावा भूजबळांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page