रत्नागिरी /-
ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात दोन बोटे तुटल्याने संपूर्ण महराष्ट्रात खळबळ माजली. महापालिका, नगरपालिका प्रशासनात काम करणारे सर्वच कर्मचारी या घटनेने हादरले.
याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत देखील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा आता समोर आला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे कारवाई होते आणि त्याचा फटका स्थानिक फेरीवाल्यांना देखील बसतो असे अनेकवेळा रत्नागिरीत घडले आहे.
आजपासून रत्नागिरीत देखील वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या नोंदी नुसार शहरात ७१४ फेरीवाले आहेत. यातील १५ टक्के परप्रांतीय आहेत. प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्व निधी योजने अंतर्गत ज्या फेरीवाल्यांनी १० हजाराचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केले होते त्यांना या लॉक डाऊन मध्ये शासनाने १५०० रुपये दिले आहेत.
लॉकडाऊन मध्ये थांबलेले सर्वेक्षणाचे काम पुन्हा सुरु होऊन आता सभागृहाची मान्यता देऊन या फेरीवाल्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.