वेंगुर्ला /-


वेंगुर्ले नगरपरिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत मत्स्य बाजार पेठेतील जुन्या १५ गाळेधारकांना पुन्हा त्याच जागी गाळे मिळणेबाबत सकारात्मक प्रक्रिया व निर्णय होताना दिसत नाही. या गाळे धारकांवर होत असलेला अन्याय सहन होत नसल्याने मी स्वखुशीने आज माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.नवीन मच्छी मार्केट उभे करताना विस्थापित झालेल्या त्या जुन्या १५ गाळेधारकांचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आज नगर परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत त्यांच्या बाजूने ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेने आपण या गाळेधारकांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. तसेच उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या व्यापाऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत विषय घेऊन सातत्याने व्यापाऱ्यां बरोबर आम्ही राहिलो. परंतु नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून गाळेधारकांच्या बाजूने निर्णय होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलल्याचे अस्मिता राऊळ यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा कार्यकारिणी
सदस्य सचिन वालावलकर,उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, विवेक आरोलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page