सिंधुदुर्गनगरी /-
जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिलेल्या शब्दाला जागत १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेल्या व्यक्तींना न्याय दिला आहे. १५ ऑगस्ट रोजी पाच उपोषणस्थळी भेट देत त्यांना सोमवारी आपले प्रश्न सोडविले जातील, असा शब्द दिला होता. त्यानुसार सोमवारी सौ सावंत यांनी बैठक घेत हे सर्व प्रश्न निकाली काढल्याने संबंधित व्यक्तींनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे केवळ शब्द देऊन न थांबता तो पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगू लागली आहे. कुर्ली येथील आपल्या घरासाठी उपोषण करणाऱ्या विधवा महिला सुवर्णा बाबासाहेब कदम यांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यासाठी नातेवाईकांचा असलेला विरोध अध्यक्षा सौ सावंत यांनी मावळवला आहे. अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेच्या मागण्यांची दखल घेतल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. ग्राम पंचायत कर्मचारी यांना १० टक्के आरक्षण नुसार भरती करण्याचा मार्ग प्रशासनासोबत चर्चा करून मोकळा केल्याने त्यांचेही समाधान झाले आहे. साटेली-भेडशी आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने येथील ग्राम्सथांचेही समाधान झाले आहे. जांभवडे येथील दत्ताराम गंगाराम मडव यांच्या जमिनीत झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी यशस्वी तोडगा काढला. त्यामुळे अध्यक्षा सौ सावंत यांच्या शब्दाने उपोषण मागे घेतलेल्या सर्व उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.