वेंगुर्ला /-
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेने श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.स्वच्छ भारत अभियान २०२१ – २०२२ व माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील ८ प्रभाग मधून ८ सुजाण नागरिकांची स्वच्छता मित्र म्हणून निवड करणे तसेच शहरामध्ये ५० वर्षाहून अधिक प्राचीन वृक्षांचे संवर्धन करणाऱ्या नागरिकांचा वृक्षमित्र म्हणून सन्मान करणे आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करिता स्वच्छता संदेश दूत नियुक्त करणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते.प्रभाग क्र. १ मधून संजय पुनाळेकर, प्रभाग क्र.२ मधून अमेय धुरी, प्रभाग क्रमांक ३ मधून महेंद्र धुरी, प्रभाग क्र.४ मधून श्रीकांत रानडे, प्रभाग क्र. ५ मधून बाबी रेडकर, प्रभाग क्रमांक ६ मधून शरद मेस्त्री, प्रभाग क्र. ७ मधून वासुदेव परब, प्रभाग क्र. ८ मधून चंद्रकांत जाधव या निवडण्यात आलेल्या स्वच्छता मित्रांना नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या मार्फत सन्मानित करण्यात आले. तसेच माझी वसुंधरा प्राचीन वृक्ष संवर्धन मोहिमेअंतर्गत ५० वर्षाहून प्राचीन वृक्ष संरक्षण व संवर्धन करून वेंगुर्ले शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी मोलाचे योगदान देणारे वेंगुर्ले नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शासनाच्या कृषीभूषण पुरस्कार सन्मानित शिवाजीराव कुबल यांना वृक्षमित्र म्हणून सन्मानित करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी उत्स्फूर्त जनप्रतिसाद मिळावा हा उद्देश समोर ठेवून व मागील दीड वर्षापासून उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे कमी झालेला जनसंपर्क वाढविण्यासाठी स्वच्छतेचे संदेश दूत म्हणून स्पंदन परिवार मुव्हमेंटचे संस्थापक, अभिनेता,लेखक, दिग्दर्शक, पटकथाकर, निर्माता त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे या अॅक्टिविस्ट पुरस्कार विजेते अमरजित आमले आणि जे जे स्कूल ऑफ आर्टस मुंबई चे माजी प्राध्यापक, चित्रकार, शिल्पकार, कलादिग्दर्शक सुनील नांदोस्कर या दोघांना वेंगुर्ले शहराचे सच्छता संदेश दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच प्राध्यापक सुनील नांदोस्कर यांनी साकारलेल्या वेंगुर्ले शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा दर्शवणाऱ्या शिल्पाकृतीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मध्ये नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेची सवय लागण्यासाठी कचरा वर्गीकरण यासाठी आवश्यक दोन कचराकुंड्या आणि प्लास्टिकचा वापर पूर्ण बंद होणेहेतू एक कापडी पिशवी व एक नायलॉन पिशवी प्रतिनिधिक स्वरुपात स्वच्छता मित्रांना वाटप करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.लवकरच शहरातील प्रत्येक कुटुंबासाठी अशा संचाचे वाटप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी मागील साडेचार वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला व स्वच्छतेचे हे काम अविरत पुढे सुरू राहावे व वेंगुर्ले शहराचे नाव देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर घेतले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच स्वच्छतेच्या या कार्यात सहभाग घेतलेल्या सर्व नागरिकांना, स्वच्छता कर्मचाऱ्यांना, सर्व प्रशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना व नगरसेवकांना याचे श्रेय दिले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप गिरप,
उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,गटनेते सुहास गवंडळकर,महेश डिचोलकर,नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे,शितल आंगचेकर, विधाता सावंत, कृपा गिरप, कृतिका कुबल,स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी,पूनम जाधव मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे व नगर परिषद स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.