कणकवली /-
विजेच्या तारांचा शॉक लागल्यामुळे दोन गाई जागीच मृत्यू झाल्या असून शेतकऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना आज सकाळी कणकवली येथे घडली. यात संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान झालेला प्रकार लक्षात घेता संबंधित शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती व भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पियाळी येथील शेतकरी विश्वनाथ विश्राम कदम (पियाळी बौद्धवाडी) हे सकाळी आपली गुरे चरावयास घेऊन गेले असताना पियाळी प्राथमिक शाळेच्या माळावर गुरे चारत असतांना विद्युतभारीत तारांमध्ये दोन गायी अडकल्या व शॉक लागून मयत झाल्या. त्यात तारांमध्ये एक बैल सुद्धा अडकला होता त्याला सोडविण्यात विश्वनाथ कदम यांना यश आले मात्र त्याच वेळी लागलेल्या विजेच्या शॉक मुळे कदम हे दूर फेकले गेले व जखमी झाले, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान शेतकऱ्याला तातडीने वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती व भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केली आहे.