कोल्हापूर /-

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटात अनेक ठिकाणी पडझड झाली होती. यातच पावसामुळे २३ जुलै रोजी दरडही कोसळली होती. तेव्हापासून कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणारा हा मार्ग बंद आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक अजूनही बंद आहे. हा मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग मंडळ शाहूवाडी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता रहाटे यांच्याकडून वाहतूक सुरू होण्याबाबत माहिती घेण्यात आली. आंबा घाट हा दोन ते तीन दिवसात फक्त दुचाकी, तसेच हलकी चारचाकी वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. तर अवजड वाहने सुरू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक पंधरकर हे पाहणी करून निर्णय घेणार आहेत. अवजड वाहतूक पावसाळा संपल्यानंतर चालू होण्याची शक्यता आहे, असं सांगण्यात आले आहे. दरम्यान, ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, असं शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितलं.

अवजड वाहतूक बंद असल्याने कोकणातील बंदरातून कोल्हापूर ,सोलापूर, हैदराबद, मध्य महाराष्ट्र इथंपर्यंत जाणारा कोळसा, क्रूड ऑइल, तांदूळ आदी साहित्याची वाहतूक ठप्प झाली आहे. तर कोल्हापुरातून कोकणाकडे जाणारे अन्नधान्य, भाजीपाला, साखर, तेल आदींची वाहतूक बंद आहे. त्यामुळे अवजड वाहने सुरू होण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जावेत, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page