वैभववाडी /-
वैभववाडी लसिकरण केंद्रावर आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पहाटेपासूनच वैभववाडी लसिकरण केंद्रावर लसिकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु आरोग्य विभागाच्या मनमानी कारभारामुळे अनेकांना लसिकरणाशिवाय राहावे लागतेय. पहाटे लसिकरण केंद्रावर अज्ञात व्यक्तींकडून सोयीनुसार नावांच्या याद्या ठेवल्या जातात. अशा तीन वेगवेगळ्या याद्या आज लसिकरण केंद्रावर आढळून आल्या. त्यामुळे वशिलाबाजीने लसिकरण करण्याचा हा प्रकार उपस्थित नागरिकांना समजताच ते संतप्त झाले आणि लसिकरण केंद्रावर गोंधळ माजला. उपस्थित नागरिक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अनेकांना पहाटेपासून रांगा लावूनही लस मिळू शकली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या नियोजनशून्य कामकाजामुळे नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. आरोग्य विभागाच्या या कारभारावर स्थानिक प्रशासनाकडून वेळीच लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.