चिंदर तेरई येथील घरांच्या नुकसानीबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक पाहणी दरम्यान आमदार वैभव नाईक यांची माहिती

मालवण /-

सिंधुदुर्गात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिंदर तेरई येथे डोंगर खचून उत्तम घागरे यांच्यासह लगतच्या अन्य घरांना मोठ्या भेगा जाऊन नुकसान झाले. घराच्या नजीकचा भाग खचल्याने बाजूने जाणारा डांबरी रस्ताही फूटभर उंच झाला. यामुळे या घरांना धोका निर्माण झाला असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल याठिकाणी भेट देत पाहणी केली. ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेत त्यांना धीर दिला. सदर घरांच्या बाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत लवकरात लवकर बैठक घेऊन यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली. तसेच पुराच्या पाण्यामुळे बांदिवडे भगवंतगड खारभूमी बंधाऱ्याचा वरील भाग वाहून गेला आहे. यामुळे बांधिवडे, भगवंतगड, लब्देवाडी, साटमवाडी, त्रिंबक, गावडेवाडी येथील जमीन खारबाधित झाली आहे. या खार बंधाऱ्याची देखील आ. वैभव नाईक यांनी पाहणी केली. हा बंधारा मंजूर करण्यात आला असून पावसाळ्यानंतर बंधाऱ्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, समीर हडकर, समीर लब्दे, पप्पू परुळेकर, विलास हडपी, संजय हडपी,चंद्रकांत गोलतकर, धनंजय नाटेकर, भाऊ परब, श्रीकांत बागवे, आशु मयेकर, शेखर पालकर, सतीश हडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page