वैभववाडी /-
तालुक्यात गेले काही दिवस अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे कोळपे बौध्दवाडी येथील राजेश नारायण जाधव यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वा. सुमारास घडली आहे. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झालेली नाही. राजेश जाधव यांच्या घरासमोर जुनाट चिंचेचे झाड होते. गेले काही दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी हे झाड उमळून जाधव यांच्या घरावर पडले. त्यामुळे घराचे छप्पर पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. तर घरातील सामानाचीही नासधूस झाली आहे. घटनेची माहीती मिळताच गावच्या सरपंच आयशा लांजेकर, उपसरपंच बाबालाल लांजेकर, राष्ट्रीय काॕग्रेस तालुकाध्यक्ष दादामियाॕ पाटणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष विशाल जाधव माजी पोलिस पाटील यशवंत कांबळे यांनी नुकसानीची पहाणी केली. तर तलाठी सुदर्शन पाटील, पोलिस पाटील विजय दळवी, यांनी पंचनामा केला आहे. प्राथमिक अंदानुसार सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले आहे.