देवगड /-
देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. नादमध्येही तीन घरांचे छप्पर उडाले. देवगड तालुक्यात पावसाने दाणादाण उडविली असून अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने नाद येथील भिकाजी पांगम यांच्या घरावरचे पत्रे उडाले तर श्रीकांत पोयरेकर व शांताराम बंडवे यांच्या घरावरची कौले उडाली. तर कोर्ले बाणेवाडी येथील शांताराम सोनू बाणे यांच्या मातीच्या घराची भिंत खाली घर असलेल्या प्रकाश धकटू बाणे यांच्या घरावर कोसळली. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास घडली. या दुर्घटनेत शांताराम बाणे यांच्या घराचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे तर प्रकाश बाणे यांच्या घरावर कोसळल्याने त्यांच्या घराचेही सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घर कोसळत असताना प्रकाश बाणे हे बालंबाल वाचले. प्रकाश बाणे यांना संतोष बाणे यांच्या घरी व्यवस्था करण्यात आली आहे. तर शांताराम बाणे या कुटूंबियांची विलास यशवंत धुळप यांच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाठी प्रियांका गोसावी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला यावेळी कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, उपसरपंच सुनिल कांबळे, पोलिस पाटील सुरेश शिगाडे उपस्थित होते. २१ डीव्ही १ जेपीजी अतिवृष्टीने कोर्ले बाणेवाडी येथील शांताराम बाणे यांच्या घराची भिंत कोसळून प्रकाश बाणे यांच्या घरावर पडली. या दुर्घटनेत दोन्ही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.