वैभववाडी /-
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील मोरीचा कठडा घसरल्याने करूळ घाटमार्ग वाहतूकीसाठी बंदी ठेवण्यात आला आहे. सध्या पर्यायी मार्ग म्हणून तात्पुरत्या स्वरूपात भुईबावडा घाटातून वाहतूक सुरू आहे.
भुईबावडा घाटातील रस्ता अरुंद असल्याने या घाटमार्गाचा वापर प्रवाश्यांकडून फारसा केला जात नाही. या घाटात अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे. असे असताना देखील सध्या करुळ घाट बंद असल्यामुळे कोल्हापूर- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवजड वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. असे असताना देखील रात्रीच्या वेळी भुईबावडा घाट मार्गे अवजड वाहतूक सुरू असल्याने या घाटमार्गाचा पर्यायी वापर करणाऱ्या प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाटातील वळणाच्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता प्रवाशांकडून वर्तविण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाने या बाबतीत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.