सावंतवाडी /-
गेले चार-पाच दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी शिरले. सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील मोती तलावालगत असलेल्या सावंतवाडी तहसीलदार यांच्या शासकीय बंगल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे. गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे या भिंतीचे दगडी बांधकाम ढासळले आहे. तसेच त्या भिंतीला लागूनच रहदारीचा रस्ता असल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. अन्यथा भिंत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर यावर योग्य तो सुरक्षिततेचा उपाय करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.