ओरोस /- जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र येत वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. अणाव -हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत कृषि कॉलेज परिसरात ही लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, लेखाधिकारी नितिन सावंत, अप्पर कोषागार अधिकारी भालचंद्र सावंत, प्रमोद चिंदरकर, समग्र शिक्षा अभियानचे सहाय्यक लेखाधिकारी अनिल साळगांवकर, शिवाजी घडेदार, रामदास सुर्यवंशी, किशन केंद्रे, गणेश धुळशेटे, वैभव साळुखे आदी यावेळी उपस्थित होते. नाशिकची दुर्घटना आपणा सर्वास अंतर्मुख करून गेली. त्यानंतरच आपण सर्वच ऑक्सीजन बाबत जागृत झालो किंबहुना ऑक्सीजन चे महत्व आपणास तेव्हाच कळले. लहानपणी शिकलेलो की दिवसा झाडे प्राणवायू बाहेर सोडतात व रात्री कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडतात. ऑक्सिजन तयार करण्याचे काम झाडाची पाने करतात . पान एका तासा मध्ये पाच मिलिलिटर ऑक्सिजन तयार करतात त्यामुळे ज्या झाडांना जास्त पानं असतात ते जास्त ऑक्सिजन देतात. तसेच वनस्पती मध्ये वातावरणातील विषारी वायू शोषणाचा गुणधर्म असल्याने आपणास त्या खूपच लाभदायक आहेत. त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी ज्यांच्यामुळे आपणास विनामूल्य ऑक्सिजन मिळतो अशा झाडांची आपण लागवड करायची, असे ठरवत गुगल सर्च व कृषी विभाग यांच्याकडे जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडां बाबत चौकशी करीत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्याचे ठरविले. १ जुलै कृषी दिनाच्या दिवशी वृक्षारोपण करण्यात येणार होते. पण काही अपरिहार्य कारणास्तव त्यादिवशी वृक्षारोपण करता आले नाही. १० जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावयचा असे ठरले. पुष्पसेन सावंत विद्यापीठ परिसरात झाडे लावायची असे ठरले .त्याप्रमाणे विद्यापीठाचे सीईओ भुपत सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. हा उपक्रम कुठल्याही शासकीय उपक्रमा अंतर्गत नव्हता तर सर्व जमलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या उस्फुर्त सहभागाने करण्यात आला. हे सर्व पर्यावरणाबद्दल चे प्रेम व सामाजिक बांधिलकी यातून घडले. अशाच प्रकारे उस्फुर्त सहभाग वाढावा आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केल्याचे लेखाधिकारी नितिन सावंत यानी सांगितले.