मुंबई /-
ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन काल विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ घातला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केले आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाची कारवाई हा शिस्तीचा भाग असून असे केले नाहीतर सभागृहात दंगली निर्माण होतील. कारण आपल्याला माहित आहे की, पाकिस्तानाच्या सभागृहात काय घडते? उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये देखील कधी कधी ही परिस्थिती उद्भवते. महाराष्ट्रात ही परंपरा पडू नये यासाठी हा कठोर निर्णय अध्यक्षांनी घेतला असल्याचे राऊत म्हणाले.
सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न:-
विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारला एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते बॉम्ब आमच्यावर टाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ते बॉम्ब त्यांच्यावरच फुटले. एक चुक किती महाग पडू शकते हे यातून समजून येईल. ते पुढे म्हणाले की, आमच्या कोकणात एक म्हण आहे ‘केले तुकां झाले माका’ अशी त्यांची गत झाली असल्याचा टोला राऊत यांनी यावेळी लगावला.