दोडामार्ग /-
विद्युत वितरणचे ग्रामीण भागातील अनेक कामांकडे दुर्लक्ष होत असून त्यांचा हा दुर्लक्षितपणा येथील नागरीकांसाठी धोकादायक ठरत आहे. असाच प्रकार झोळंबे येथे घडला असून झोळंबे इमारतीवरून ११ केव्हीची उच्च दाब असलेली वाहिनी गेली असून ती बदलण्यास विद्यूत विभाग अनेक निवेदने देऊनही टाळाटाळ करत आहे. सद्य स्थितीत ही विद्युत वाहिनी इमारतीला टेकली आहे व इमारतीचे छप्पर लोखंडी असल्याने पावसाळ्यात या इमारतीत विद्युत शॉक बसत आहे, याबाबत विद्युत विभाग दोडामार्ग यांना वारंवार निवेदने दिली तसेच प स च्या मासिक सभेत याबाबत ठराव संमतही करण्यात आला मात्र याकडे विद्युत विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, विद्युत वितरणचा हा वेळकाढू पणा कोणत्याही दुर्घटनेस कारणीभूत ठरल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल झोळंबे ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.याबाबत झोळंबे सरपंच राजेश गवस यांनी विद्युत वितरणला निर्वाणीचा इशारा दिला असून ही विद्युत लाईन तात्काळ न बदलल्यास होणाऱ्या परिणामांना विद्युत विभाग जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे.