मालवण /-

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा घेतला आढावा तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील बसला असून नुकसान झाले आहे. समुद्र खवळलेला असल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देत याठिकाणी असलेल्या रहिवाशांची विचारपूस करत नुकसानीची पाहणी केली व पंचनाम्याचा आढावा घेतला. याप्रसंगी आ. वैभव नाईक यांना किल्ले रहिवाशांनी वस्तुस्थितीची माहिती दिली आ. वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क करून किल्ले रहिवाशांना किल्ल्यावरून ये- जा करण्यासाठी बोट सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर व श्री. भवानीमाता मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरण कामाचा आढावा देखील घेतला. चक्रीवादळामुळे विद्युत पोल पडल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीज पुरवठा खंडित झाला होता. खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अथक प्रयत्नांनी महावितरणकडून चार दिवसांपूर्वी हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब,मंगेश सावंत, किल्ले रहिवाशी श्रीराम सकपाळ, सयाजी सकपाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page