सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसें दिवस विक्रमी वाढ होत आहे. जनमानसात एक भीतीचे वातावरण आहे त्यात मृत्यूदरही वाढला आहे. याचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्त्री राजसत्ता संस्थेच्या संचालक मंडळाकडून एक पाऊल उचलण्यात आले.
‘कोविड पॉसिटीव्ह’ रिपोर्ट आल्या पासून मनात एक तणावाची स्थिती निर्माण होते. आजू बाजू च्या सकारात्मक गोष्टीं पेक्षा नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष जाते. आणि त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे नकारात्मक विचार बाहेर काढून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले समुपदेशन संस्थेचे अध्यक्षा जान्हवी सावंत व श्वसन प्रकार व सकारात्मक विचारांचे मेडिटेशन संस्थेच्या सहकोषाध्यक्ष श्रेया गवंडे तसेच रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना संस्थेच्या कोषाध्यक्षा पूनम चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. मनात सतत भीती, नैराश्य, मानसिक तणाव या सर्व नाकारात्मत गोष्टी मूळे शरीर जेव्हा विषाणू संसर्गाशी लढत असते तेव्हाच नकारात्मक विचारांमुळे प्रतिकार शक्तीवर परीणाम घडत असतात.
जगात असे अनेक जण आहेत की ज्यांनी ‘पॉसिटीव्ह अप्रोच’ किंवा सकारात्मक विचारांमुळे असाध्य रोगांवर विजय मिळवला आहे.
सकारात्मक विचार हे सकारात्मक बदल शरीरात घडवत असतात आणि संसर्गाला यशस्वी पणे लढण्यासाठी बळ देतात.
माईल्ड ते मॉडरेट लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये असे आढळून आले आहे की संसर्ग झाल्या पासून ६/७/८ व्या दिवशी जेव्हा थोडासा ऑक्सिजन लेवल वर परिणाम होतो, थकवा जाणवतो आणि घुसमटल्या सारखं वाटतं तिथूनच भीती ची सुरुवात होते. खरंतर ह्याच मानसिक स्थितीमध्ये धीराने सामोरे जायचे असते. एकदा ही मानसिक स्थिती संपली की सकारात्मक बदल जाणवायला लागतात.
आज खरंच खूप योग्य उपचार होत आहेत, त्यात बरोबर प्राणायाम श्वसनाचे व्यायाम, संतुलित आहार, शरीरातील पाण्याची मात्रा आणि सकारात्मक विचार असले तर प्रत्येक जण बरा होऊ शकतो.
आणि हे अनेक नव्वदी पार वयोवृद्ध मंडळींनी कोरोनावर मात करून सिद्ध करून दाखवले आहे. हे सर्व विचारात घेऊनच स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान ही संस्था हा सामाजिक उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येई पर्यंत जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर वर सुरू ठेवण्यात येणार आहे.